पिंपरी जलसेनमध्ये ११ दिवसानंतर वीजपुरवठा सुरळीत ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे नागरिक होते अंधारात


पिंपरी जलसेनमध्ये ११ दिवसानंतर वीजपुरवठा सुरळीत
ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे नागरिक होते अंधारात

पिंपरी जलसेन 

गेल्या आठवड्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पिंपरी जलसेनमध्ये गावठाण भागातील विजेचे खांब पडल्याने तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण व ठेकेदार यांच्या घोळात पिंप्रीकर तब्बल ११ दिवस अंधारात होते. अखेर महावितरण व ठेकेदाराकडून शुक्रवारी दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात आला.
         पावसाने विजेचे खांब पडल्याने व तारा तुटल्याने पिंपरी जलसेनमधील कदम मळा व गावातील इतर ठिकाणचा मंगळवारी ६ जुलै रोजी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर नागरिकांनी वारंवार वडझिरे महावितरण कक्षाचे उपअभियंता गौरव चरडे, पारनेरचे सहाय्यक अभियंता प्रशांत अडभाई यांना संपर्क करून वीजपुरवठा सुरळीत करून देण्याची विनंती केली. परंतु दुरुस्तीच्या कामाचा ठेका निघोज येथील ठेकेदाराला दिला असून त्याच्याकडून तुम्ही कामे करून घ्या असा सल्ला महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात येत होता. ग्रामस्थांनी ठेकेदाराला संपर्क केला असता कामासाठी माणसे उपलब्ध नसल्याने काम करता येत नसल्याची सारवासारव ठेकेदार करत होता.  याबाबत "रोख ठोक न्यूज, दैनिक पुढारी, दैनिक नगर सह्याद्री" ने बातमी छापून ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या होत्या.नागरिकांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून हे काम करण्यास भाग पाडले. त्यानंतर शुक्रवारी (१६ जुलै) महावितरण व ठेकेदार यांच्याकडून नवीन खांब उभे करून हा वीजपुरवठा तब्बल ११ दिवसानंतर सुरळीत करून देण्यात आला आहे. वीजबिल थकीत असल्यानंतर मीटर कट करण्यासाठी जेवढी तत्परता महावितरणाकडून दाखवण्यात येते तेवढीच तत्परता वीजपुरवठा खंडित झाल्यावर सुरळीत करून देण्यासाठी दाखवावी असा नाराजीचा सूर नागरिकांमधून येत आहे.

Post a Comment

0 Comments