रोख ठोक न्यूज :-
लाॅकडाउनमुळे राजस्थानमधील कोटा शहरात लोणावळ्यातील काही मुले अडकली आहेत. त्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मुलांना घेऊन यावे असे साकडे घातले आहे.
मुख्यमंत्री साहेब, आमची मुले राजस्थानमधील कोटा शहरात अडकली आहेत. त्यांची खाण्याची सोय नाही. रात्री अचानक मुलांचा काळजीने भरलेला फोन येतो. तेव्हा जीव कासावीस होतोय. त्यांना किती दिवस धीर द्यायचा...असे सांगताहेत चिंताग्रत लोणावळ्यातील पालक. लॉकडाउनमुळे त्यांची मुले गेल्या दोन महिन्यापासून अडकून पडली आहेत. तर आम्हाला घरी जाऊ द्या, नाही तर आमचे खूप हाल होतील, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउन केले आहे. नेमकी त्यात लोणावळा, खोपोलीतील आयआयटी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी कोटा येथे गेलेली विद्यार्थी अडकून पडले आहेत. खानावळ बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. त्यांची गैरसोय होत आहे. तेथील खासगी शिकवणी वर्ग बंद आहेत, ऑनलाइन क्लासही होत नाहीत. आम्हाला आमच्या घरी पाठवा, विद्यार्थी आपापल्या घरात क्वारंटाईन करून घेऊ, असे विद्यार्थी दिव्यांश कुंभार यांनी सांगितले.
शहरात कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्याने विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर पडता येत नसल्याची चिंता पालक स्वानंद कुंभार यांनी व्यक्त केली.
ज्या प्रमाणे उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील मुलांना वाहनांची सोय करून त्यांच्या राज्यात नेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी एकाकी पडली आहेत.
राजस्थान सरकारकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत असली तरी, आम्हाला तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याचे विद्यार्थी शुभम ओसवाल याने सांगितले. ""काही विद्यार्थ्यांना दिवसभरातून एकदाच जेवण मिळत आहे, मुलांचे वय लहान असल्याने ही मुले भेदरली आहेत. त्यांचे मनोबल खचू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच इतर राज्याप्रमाणे पाऊल उचलावीत, अशी विनंती पालक योगेश ओसवाल व ओमप्रकाश यांनी केली आहे.

0 Comments