राज्य सरकारची ब्लूप्रिंट आहे तयार : नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

रोख ठोक न्यूज :-


राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ७६२८ झाला आहे. तर, आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे., ह्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण न करण्याचं आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले त्यांचे देखील आभार मानले तर राज्याची तयारी कशी चालू आहे याची देखील ब्लूप्रिंट लोकांच्या समोर सादर केली .


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील काही खास हायलाईट्स

  • करोनावर औषध येण्याधीच आपला देश आत्मविश्वास आणि संयमाच्या बळावर हे युद्ध जिंकेल- उद्धव ठाकरे.
  • या संकटाकडं पूर्णपणे दुर्लक्ष न करता आपलं आयुष्य पूर्वपदावर कसं आणता येईल हे आपल्याला पाहायचं आहे.
  • मला कुठल्याही राज्याशी तुलना करायची नाही. पण आपण महाराष्ट्रात १ लाख ८ हजार चाचण्या केल्या आहेत.
  • लक्षणं दिसल्याबरोबर फिव्हर क्लिनिकमध्ये जा. दुर्लक्ष करू नका. अंगावर काढू नका.
  • ग्रामीण भागात आपण काही प्रमाणात उद्योगधंद्यांना मुभा दिलीय. त्याचा रिपोर्ट रोज माझ्याकडं येतोय. आज संध्याकाळीही मी आढावा घेणार आहे. त्यानुसार ३ मे नंतर लॉकडाऊनचं काय करायचं त्याचा निर्णय घेऊ.
  • २० टक्के लोकांमध्ये मध्यम, गंभीर आणि अतिगंभीर लक्षण दिसताहेत. ती देखील दिसता कामा नयेत.
  • हा संयमाचा खेळ आहे. त्यामुळं गाफील राहून चालणार नाही.
  • ३ मे रोजी लॉकडाऊन संपतोय. २० एप्रिलपासून आपण हातपाय हलवायला सुरुवात केलीय. पण मुंबईत मुभा दिल्यानंतर पुन्हा वर्दळ वाढली. हे होता कामा नये.
  • राज्यातील परिस्थितीचं त्रयस्थपणे निरीक्षण करा. आम्ही कुठं कमी पडतोय ते सांगा, अशी विनंती आम्ही केंद्रीय पथकाला केलीय.
  • आकड्यांबाबत आम्ही काहीही लपवलेलं नाही. लपवण्यासारखं काहीच नाही. खुद्द केंद्राचं पथक आपल्या राज्यात मुक्काम ठोकून आहे.
  • पुन्हा गर्दी झाली तर आतापर्यंतची आपली तपश्चर्या आहे ती व्यर्थ जाईल.
  • ट्रेन सुरू होणार नाही. आपल्याला गर्दी करता येणार नाही. महाराष्ट्राचे विद्यार्थी इतरत्र आहेत. त्यांनाही आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • महाराष्ट्रात असलेल्या मजुरांना त्यांच्या घरी कसं पाठवता येईल यासाठी चर्चा सुरू आहे.
  • केंद्र व राज्य सरकारमध्ये एकोपा असताना काही लोका राजकारण करण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांना तो करू द्या.
  • सत्ता येईल, जाईल. पण जीव गेला तर पुन्हा येणार नाही.
  • जिथं कुठं लसीवर संशोधन सुरू आहे. तिथं आपला सतत संपर्क आहे.
  • आपण कुठंही कमी पडत नाही आहोत. सरकार म्हणून जे करता येईल ते सर्व करतो आहोत.
  • लॉकडाऊनमुळं करोनाच्या विषाणूचा गुणाकार रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
  • करोनामुळं मृत्यू झालेले पोलीस आपल्यासाठी शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारे मदत केली जाईल.
  • आज सर्व देवळं बंद असताना देव कुठं आहे? तर, देव आता आपल्यात आहे. डॉक्टरांमध्ये, पोलिसांमध्ये, सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
  • आपापले धार्मिक सण, उत्सव बाजूला ठेवून माणुसकीच्या धर्माला प्राधान्य दिल्याबद्दल सर्व धर्मीयांचे आभार.
  • हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण ही लढाई आपण लढतोय.

Post a Comment

0 Comments